Monday, 30 October 2017

सफर सुधागडच्या नाणदांड आणि घोणदांड घाटवाटांची


                                     सफर सुधागडच्या नाणदांड आणि घोणदांड घाटवाटांची

सुधागडची सफर होऊन बरीच वर्ष ओलांडली होती त्यानंतर त्या विभागात जास्त भटकंती करण्याचा योग आला नव्हता. मोबाईलवर लुडो गेम खेळत असताना अचानक विश्राम दादांचा मेसेज आला "उद्या कुठे जाऊया का" तसं घरी राहून मला कंटाळा आला होताच म्हणा. त्याला कॉल करून त्यांच्या घरी येतो म्हणून बॅग भरून घरच्यांना भटकंतीसाठी जातोय असे सांगून निघणार आणि घराच्या बाहेर पाय पडता पडताच छोट्या भाऊ रायांची हाक "कोणत्या गडावर स्वारी साहेबाची" थोडा वेळ विचार करून पटकन तोंडात सुधागड नाव आलं आणि तिथून काढता पाय घेतला नाहीतर माँ साहेबांची प्रश्नावली तयार असतेच. मग कुर्ला वाशी करून विश्राम दादांच्या घरी आलो साहेबानी लागलीच प्रश्नकुठे जाऊया” लगेच उत्तर सुधागडच्या घाटवाटांची सफर.  सकाळी ला विश्राम दादाचे घर सोडून पनवेल एसटी स्टॅन्डवर गरमागरम चहा घेऊन खोपोलीच्या दिशेने गाडी पळवली. हवेत गारवा जाणवू लागला शिवाय थंडीचे दिवस त्यात धुकं त्यामुळे पाच दहा मीटर पेक्ष्या पुढील रस्ता दिसत नव्हता खोपोली वरून पाली साठी वळलो. एक ट्रक दणदणाट करत पाली कडे सुसाट पळत होता मग विश्राम पण त्यांच्या मागे सुसाट गाडी पळवत होता पाली जवळील रस्त्यावर पडलेल्या विहिरी सदृश एका खड्डयात गाडी जोरात आपटली आणि माझ्या पाठीच पार भुगा झाला. मग साहेबांना गाडीवर मागे कोणीतरी बसलं आहे याचा साक्षात्कार झाल्यावर गाडी सावकाश चालवत गाडी पाली मध्ये आणली. सकाळी :१५ च्या सुमारास मिसळपाव वर येथेच्छ ताव मारून ठाकूरवाडीत :३०ला पोचलो गावातील सर्व मंडळी चौकशी करू लागेल कुठे जाणार, सुधागडवर का, वाटाड्या हवा आहे का, जेवणाची सोय वैगरे वैगरे आम्ही लागलीच मुद्याला हात घातला. नाणदांड घाटाची वाट दाखवायला कोणी येणार आहे का तसे बहुतेक जण माघारी त्यातील एक आजोबा बोलले "पोरांनो नाणदांड ने आता जास्त कोणी जात नाही तुम्ही एक काम करा नाळेच्या वाटेने जा आणि त्याचं वाटेने खाली या" आम्ही आजोबा ना बोललो "बाबा फक्त वाटेला लावून दिलंत तरी पुढे आम्ही वाट शोधत जाऊ" आजोबानी गावाच्या बाहेरील वाटेला बोलले  "वाटेत शेतावर कामाला गेलेली मंडळी भेटतील ती तुम्हाला नाणदांडच्या वाटेला लावून देतील" असे म्हणून माघारी फिरले.

गावातून बाहेर येऊन उतरणीला म्हणजेच नदीकडे उतरू लागलो. सुधागड आणि त्याच्या जवळील प्रदेशात बर्याचश्या जुन्या घाटवाटा आणि लेण्या आहेत त्यात वारसदार, वाघजाई, सवाष्णी तर घनगड जवळ डेऱ्या, नाणदांड, घोणदांड, गाढवलोट अश्या जुन्या वापरातील घाटवाटा शिवाय खडसांबळे आणि ठाणाळे लेण्या आहेत यामुळे या परिसराला प्राचीन काळापासून खूप महत्व आहे. चौल बंदरातून उतरणारा माल कोकणातून घाटावर ये जा करण्यासाठी या घाटवाटांचा वापर होत असे तसेच घाटवाटांच्या स्वरक्षणासाठी कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला आणि घनगड असे बलदंड किल्ले बांधण्यात आले असावेत. आता समोर सह्याद्रीचा अफाट नजारा डोळ्या समोर येऊ लागला डावीकडे सुधागड समोर तैलबैलाच्या जुळ्या कातळभिंती, घोडेजिनीची वाट, भोरप्याची नाळ सर्व डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवत पुढे निघालो.
शेतावर चाललेले दादा 
सहयाद्रीचा अफाट नजारा सुधागड तैलबेला 
तेच एक दादा शेतीच्या कामानिमित्त शेतावर जात होते त्यांना वाटेला लावून देण्याबद्दल विचारलं असता त्यानी लगेच होकार देत त्यांच्या बरोबर आम्ही वाटेवर चालू लागलो. डावीकडे एक छोटासा झाप आहे आणि शेत तिथूनच वाट आता नदी पार करून पुढे चढत होती दादांनी हीच वाट पकडून सरळ जा तिथे धनगराचा झाप आहे तिथून उजवीकडे वळा अस सांगून माघारी वळले.
नदी ओलांडून उजवीकडे वाट वळते 
धनगर वाड्याकडे जाणारी वाट 
 समोर गोल कातळकडा दिसतोय त्यांच्यावरून वाट जाते 
ओढ्याच्या उजवीकडून वाट आता जंगलात घुसली तसं थंडगार ऐसी मध्ये आल्यासारखं वाटलं दहा ते पंधरा मिनिटात धनगर वाड्याजवळ आलो. धनगर वाडयाजवळून एक वाट सरळ तर एक वाट उजवीकडे  पुढील वाट योग्य आहे का वाड्याजवळ कोणी आहे यासाठी हाकारे मारले. वाड्याच्या मागून एक दादा आले त्यांना नाणदांड ने जायचं सांगितल्यावर त्यांनी आम्हा दोघांस उजवीकडच्या वाटेने जायला सांगितले शिवाय वाटेवर आता गवत उगवलं आहे त्यामुळे सांभाळून जाण्यास सांगितले

धनगरवाड्याकडे जाताना लागलेला ओढा    
सुधागड दर्शन 
धनगरवाडा 
उजवीकडील वाट पकडून वाट आता चढणीला लागली पहिल्या एक दोन टप्यानंतर धाप लागू लागली थोडे अंतर चालून गेलो तेच एक ओढा वाटेवर लागला इथे थोडं खाऊन पुढे निघालो. वाट ओढा ओलांडून पलीकडे सरळ सोंडेला लागते आणि इथूनच आपली वाट लागायला सुरवात होते ती अशी कि या वाटेवरून सहसा कोणी जात नाही तसेच पावसाळ्यानंतर या वाटेवरून  कोणी गेलं नव्हतं  त्यामुळे वाटेवर भरपूर गवत हे गवत येवढं मोठे होते कि समोरील चालणारी व्यक्ती दिसत नसे शिवाय पाया खाली काय आहे ते पण दिसत नव्हते
दाट जंगलातून जाणारी वाट

हा छोटा ओढा पार करून डावीकडे वाट आहे

आंब्याच्या झाडाखालून जाणारी वाट 
त्यात सरळसोट चढाई पावलं पुढे गेलो कि पावलं परत मागे येत होतो नाकात आणि तोंडात गवत जाऊन जीव मेटाकुटीला आला जणू काही पण पायाखालील वाट काही सोडली नाही. अर्धी अधिक चढाई झाली होती मग मस्त मळलेली वाट लागली शिवाय माथा जवळ वाटू लागला होता तरी एक तासाची चढाई झालीच ती करून सकाळच्या ११ वाजता नाणदांड घाटाच्या माथ्यावर आलो
माणसापेक्ष्या उंच गवत
नाणदांडच्या वाटेवरून

माथा जवळ दिसताना 
जवळील एका झाडाजवळ बॅग फेकून सरळ आडवाचं झालो विश्राम मागे फिदीफिदी हसत होता पण त्याच्याकडे लक्ष ना देता मस्त ताणून दिली आता शरीर शांत झालं तेव्हा केवणी गावाकडे निघालो. भर दुपारी उन्हातून चालतोय असं एक क्षण सुद्धा वाटलं नाही एवढा भन्नाट वारा सुटला होता केवणीच्या पठारावर दहा पंधरा मिनिटात केवणीतील एक घराजवळ आलो. 
केवणीच्या पठारावरून दिसणारा सह्याद्रीचा अफाट नजारा 
केवणी गाव
केवणी गावातील एकमेव घर ढेहबे कुटूंबातील आजी आजोबा आणि त्यांनी पाळलेली ४ ५ गुरे बाकी केवणी गावात कोणी राहत नाही आजीने पाणी देत विचारपूस केली कुठून आलात पुढे कसे जाणार वैगरे आम्ही घोण्याच्या दांडा ने जाणार म्हटल्या वर आजी बोलल्या "त्या पेक्ष्या नाळेच्या वाटेने जा लवकर आणि सरळ ठाकूरवाडीत जाल" पण आम्हांला नाळेच्या वाटेने जायचे नव्हते हे बहुतेक आजी ने चांगलंच हेरलं होतं. आजीने घरातून बाहेर येऊन घोण्याच्या दांड्याची वाटेबद्दल माहिती सांगितली समोरील वाटेने सरळ जावा थोड्या अंतरावर उजवीकडे कडे एक वाट जाईल तिकडे न जाता सरळ जात रहा. उजवीकडील वाट नाळेच्या वाटेला लागेल सरळ गेल्यावर वाट उतरताना एक अर्धे मोडलेले आंब्याचे झाड़ लागेल म्हणजे तुम्ही वाटेवर बरोबर आहेत समजा अजून थोड़े पुढे गेल्यावर उजवीकडे एक बंद केलेली वाट आहे तिथून खाली उतरा डावीकडील वाटेकडे जाऊ नका" एवढं सर्व डोक्यात साठवून आजीला नमस्कार करून पुढील वाटेला लागलो आजीने सांगितल्याप्रमाणे उजवीकडील नाळेची वाट सोडून सरळ निघालो.
केवणीतून घोणदांड घाटाच्या वाटेला जाताना 
   विश्राम दादा वाट शोधताना 
मग वाट अर्ध्या तुटलेल्या आंब्याखाली आलो थोडा वेळ आराम करून पोटपुजा करून घाटवाट उतरू लागलो तेव्हा दुपारचे १:३० वाजले होते. उन्हं जास्त असलं तरी मोठमोठया झाडातून त्याचा त्रास कमीच होत होता त्यामुळे निवांत उतराई चालली होती एक मोठा खडक पार करून वाट मधेच डावीकडे वळली. 
हिर्डी ते आसणवाडी प्रदेश 
डेऱ्या घाट आसणवाडी
आजीने सांगितले होत ते पटापट उतराईच्या नादात डोक्यातून निघून गेलं होत त्यामुळे डावीकडील कड्यावर आलो पुढे वाट अशी नाहीच समोर डेऱ्याघाट, आसनवाडी, हिर्डी असा प्रदेश उलगडला. मग परत थोडे मागे येऊन मूळ वाटेवर आलो इथे गाईगुरे खाली जाऊ नये यासाठी हि वाट बंद केलेली दिसली त्यावरून उड्या टाकून पुढील वाटेला लागलो. 
मळलेली वाट
 समोर असलेल्या गोल कातळाच्या डावीकडून वाट खाली उतरते 
आता वाट मस्त मळलेली सरळ खाली उतरत उजवं डाव वळण घेत खालील पठारावर आली जंगलातून जसे पठारावर आलो तसे मानमोडणारी सुरेख दृश्ये समोर दिसू लागली. उजवीकडील पदरातून जाणारी वाट सोडून खालील वाटेला लागलो हि वाट सरळ नागशेतला उतरते. 

तसं पाहिलं तर उजवीकडील वाट पकडून खडसांबळे लेणी पाहून ठाकूरवाडीत जाऊ शकत होतो पण आम्हांला वेड लागले होते ते कोंडजाई डोहाचे नागशेतच्या पलीकडील धनगरवाडी जवळचा पूल पार करून कोंडजाई डोहाजवळ आलो. एव्हाना घड्याळात ३ वाजले होते परत एकदा पोटात सुका मेवा टाकून थोडी पडीक मारली आम्ही दोघेही एवढे शांत झोपलो होतो कि कधी दुपारचे ४ वाजले कळले नाही. 
कोंडजाई देवी जवळील कोंड
 कोंडजाई देवी 
  कोंडजाई देवी परिसर 
गावातील एक काका मासे पकडण्यासाठी जेव्हा डोहाजवळ आले तेव्हा त्यांनी आम्हांला उठवलं पटकन आवरा आवरी करून फ्रेश झालो काकांचे आभार मानून ठाकूरवाडीच्या वाटेला लागलो. डांबरी रोडवरील चाल कंटाळवाणी वाटू लागली मध्येच एक वाट उजवीकडे नदीकडे वळलेली दिसली. नदीतून पटापट अंतर पार करून नेणावली गाव गाठलं इथे एका दुकान वजा घरात चहा भेटेल का चौकशी केली असता दुकानातील ताईने चहा लगेच समोर केला. गवती चहा पिऊन चालण्यात आलेली मरगळ जणू कुठल्या कुठे उडून गेली होती आता पुढील वाटचाल आरामात करत खंडसांबळे गावातील पूल पार करून ठाकूरवाडीच्या वाटेला लागलो बरोबर संध्याकाळी ६:३० संधीप्रकाशात ठाकूरवाडीत पोचलो. सकाळी भेटलेल्या आजोबाना केलेल्या तंगडतोडीचा लघुचित्रपट सादर केला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल मोबदला देण्याचा प्रयन्त केला पण आजोबांनी तो नाकारला उलट आम्हांला घरी नेवून मस्त गवती चहा पाजला. आजोबांचा प्रेमळ निरोप घेऊन विश्राम ने गाडी पालीच्या दिशेने पळवली मग खोपोली पनवेल करून विश्रामच्या घरी रात्री ९:३० ला पोचलो. सुधागडच्या त्या दोन घाटवाटांनी मनात घर नक्कीच केलं पुढील काही वर्षात तेथील प्रदेशाचा कायापालट होऊ नये तेथील रांगडं पण तसेच रहावं हीच मनोमन इच्छा