Sunday, 23 June 2019

सफर भीमाशंकरच्या कुशीतील घाटवाटांची खेतोबा आणि वाजंत्री घाट


                    सफर भीमाशंकरच्या कुशीतील घाटवाटांची 
                          खेतोबा आणि वाजंत्री घाट
डोंगरदर्यातील वनश्रीने नटलेले रम्य ठिकाणे ट्रेकर्स मंडळींना कायम खुणावत असतात. गाव,वाड्या,वस्त्या त्यांच्या दळणवळणाचे साधन म्हणजे घाटवाटा. या घाटवाटा पायाखाली घालून निसर्गाचा मनमुराद आनंद घेणारे ट्रेकर्स खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणायला हरकत नाही. अश्याच एका निसर्गरम्य भटकंतीसाठी माझ्या डोक्यात घाटवाटांचा भन्नाट हटके प्लॅन तयार होता यावेळी ट्रेकिंग मधले माझे खास मित्र विश्राम आणि रुप्या (मित्रच कश्याला सखे भाऊच म्हणा) या दोघांनी टांग दिली. मग काय सचिन आणि राकेश या दुसऱ्या जोडगोळीला बरोबर घेऊन प्लॅन सार्थकी लावायचा मनसुभा आखला. तसे या दोघांनी या आधी हि माझ्या बरोबर बहुतेक ट्रेक केलेले पण घाटवाटा मध्ये कधी कोणत्या क्षणी बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि त्या परिस्थितीला कसं सांभाळायच यात विश्राम आणि रुप्या दोघेही माहीर. २२ जुनला विश्रामच्या नवी मुंबईच्या रूमवर आम्ही तिघे रात्री जरा उशिराच पोचलो मग रात्री २ वाजेपर्यंत पुढील प्लॅनबद्दल गप्पागोष्टी करता करता कधी निद्रादेवीच्या आधीन गेलो कळलंच नाही. सकाळी ५ ला विश्रामने आम्हां तिघांना उठवले सकाळीच सकाळी सचिनची किरकिर चालू झाली एका गाडीवरून तिघे कसे जाऊ कोणी पकडलं तर. राकेश तर खूप वैतागला होता त्याच्यावर मग विश्रामने सचिनला त्याच्या कानात सातारी भाषेत चारोळ्या वाहल्या तेव्हा कुठे ह्याच तोंड कायमच बंद झालं. सकाळी ५:३० ला विश्रामच नवी मुंबई मधील घर सोडलं पाऊसाची रिपरिप चालूच होती पण आम्हाला त्याची तमा नव्हती. कर्जतच्या स्टेशन जवळील एका हॉटेल मध्ये भरपेट न्याहरी करून आंबिवली मध्ये पोहचेपर्यंत तिघेही ओलेचिंब भिजलो होतो. 
पाऊसच्या मधीच जोरदार सरीवर सरी येत मग अचानक गायब होत असा लपाछुपीचा डाव चालला होता जणू आंबिवलीच्या पुढे काही पिकनिक छाप लोकांच्या गाड्या नजरेस आल्या त्याच्याकडे कानाडोळा करत कामतपाड्यात पोचलो तेव्हा सकाळचे ८:१५ वाजले होते. गावात वाटेची माहिती घेण्यासाठी राकेशला पाठवले पण गडी खाली हात आला बहुतेक घरांना कड्या आणि कुलुपे होती २छोट्या मुलांना विचारलं तर सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी शेतावर गेले आहेत कळलं. मग एका घरासमोर गाडी पार्किंग करणार तेच आतून एका ताईंचा आवाज आला "कुठे वाजंत्री ने खेतोबाला जाणार का" मी बोललो "शिडीने धनगरवाडा मग पुढे खेतोबा आणि परत येताना वाजंत्री ने येऊ" तसा ताईने शिडी ने नका जाऊ असा नन्हा चा पाढा पाठ करून दाखिवला. ताईची समजूत काढत त्याना बोललो "जर आम्हाला जमल नाही तर परत आल्या मार्गी मागे येऊ" असं आश्वासन दिलं. तेव्हा कुठे ताईं वाट दाखवण्यास तयार झाल्या वाट कामतपाड्यातील डांबरी रस्ता संपतो तेथील शेवटचं घर आहे त्याच्या मागून वाट डोंगर रांगेवर जाते समोर तुम्हांला जामरुंगचा डोंगर दिसतो. त्यांच्या डावीकडून वाट 
जामरुंगचा डोगर 

पेठचा किल्ला 
शिडीच्या वाटेला मिळते मजल दरमजल करत पठारावर आलो इथे २वाटा फुटतात एक डावीकडे जामरुंगच्या डोंगराला वळसा मारायला जाते तर दुसरी उजवीकडे आपण डावीकडील सौम्य चढणीची वाट पकडून पुढे निघायचं. पठारावरून सह्याद्रीचा अफाट नजारा दिसत होता डावीकडे पदरगड ते खेतोबाची क्रेस्टलाइन तर उजिवीकडे अंधारी घाट ते पेठ किल्ला असा प्रदेश उलगडत होता. 

इथे डावीकडील वाट पकडावी 

जामरुंग डोंगर पार करून खेतोबाच्या शिडी कडे जाताना 


पाऊसाची रिपरिप चालूच होते सचिन आणि राकेश फोटोग्राफी चा भरपूर आनंद लुटत माहिती घेत पुढे चालले होते. जामरुंगच्या डोंगराला वळसा घेत आमची पायगाडी पहिल्या शिडी जवळ आलो थोडी दक्षता घेत पहिली शिडी चढलो एव्हाना पाऊस थांबला होता.


सकाळचे ९:३० वाजले होते मस्त गार वारा सुटला होता. सचिन ने जरी गड किल्ल्याचे ट्रेक असले तरी घाटवाटांन मध्ये नवखा होता त्यामुळे राकेशला पुढे ठेवून सचिनला मध्ये ठेवले होते आणि मी शेवटी राहिलो होतो. शिडीच्या वाटेवरील कातळकडा शेवाळं मुळे निसरडा झाला होता त्यामुळे एकमेकांची काळजी घेत दुसऱ्या लोखंडी शिडी जवळ आलो. 
पहिली शिडी

दुसरी शिडी
मागे पदरगड, तुंगी त्यावर पडणारा जोरदार पाऊस अस निसर्गरम्य वार्तावरण निर्माण झालं होतं. दुसरी शिडी पार करून तिसऱ्या शिडी जवळ आलो ती आरामात पार करत पदरात आलो आता सचिन बोलू लागला पोचलो पण खरी मज्जा तर पुढे होती. 

तिसरी शिडी 
उजवीकडे खेतोबाची घळ 
मी बोललो त्या घळीतून त्या टोकावर जायचं तसं त्यांचा चेहरा पाहण्यालायक होता. राकेश तर पोट धरून पठारावर लोळत होता एक निर्मळ पाण्याचा ओढा बघून मस्त पेट पूजा केली आणि पुढील वाटेला लागलो.  खेतोबाच्या या पठारावर असंख्य खेकडे आणि त्याची बिळे आहेत त्यांना लंगडी घालून वाचवत पुढील वाटेला लागलो. आम्ही धनगरवाडा शोधात होतो पण तो काही कुठे दिसेना अचानक एका ठिकाणी वाट हरवली मग थोडी शोधाशोध केल्यावर सापडली. वाटेवर भगव्या रंगाचे रिबीन झाडाला लावलेले आढळले. आम्ही योग्य मार्गावर आहोत याची खबरदारी घेत पुढे निघालो वाटेत एका झाडाच्या खोडावर खेतोबा मंदिर असा फलक दिसला.

 या फलकाच्या डावीकडे खेतोबाची वाट आणि उजवीकडे वाजंत्री घाटाची वाट गेली आहे 
खेतोबाची घाटाची चढाई 
या फलकाच्या उजवीकडे जाणारी वाट वाजंत्री घाटाकडे जाते हे नंतर कळलं कारण ती वाट सहसा दिसत नाही आम्ही फलकाजवळून डावीकडे खेतोबाच्या घळीकडे वळलो. आता छातीवर येणारी चढाई चालू झाली त्यात पाऊसाने जोर धरला पूर्ण ओलेचिंब भिजलो होतो त्यात मधेच धुकं ते एवढं कि ४ ते ५ फुटावरील माणूस दिसत नव्हता. 
 खेतोबाच्या शेवटच्या चढाई दरम्यान मागे दिसणारा सह्याद्रीचा अफाट नजारा 

 खेतोबाची घळ 

एका छोट्या कातळटप्प्याला हाशहुश करत पार करून खेतोबा घाटाच्या माथ्यावर आलो आणि बॅग बाजूला फेकून कातळावर मस्त ताणून दिली. सह्याद्रीच्या सह्य धारेवर मस्त थंडगार वारा पिऊन पेठच्या किल्ल्यावर नजर फेकली गेली तेव्हा असं वाटलं कि शिवलिंगावर आकाशातील असंख्य नभ जलअभिषेक करत आहेत कि काय जणू असं वाटत होते तो देखावा डोळ्यात साठवत आम्ही तिघेही खूप वेळ एकाच ठिकाणी स्तब्ध बसून होतो.
धुक्यात हरवलेला पेठचा किल्ला 

तेच जोरदार पाऊसाने दगड फेक केल्यागत आम्हा तिघांना एवढे झोडपले कि पळत पळत खेतोबाचे मंदिर गाठले पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. मग घरून आणलेली शिदोरी मंदिरातच सोडल्या भरपेट खाल्यावर शरीरात थोडी तरतरी आली 

खेतोबा मंदिर 
एव्हाना घडाळ्यात १२:०० वाजले होते आता पाऊले परतीच्या मार्गाला लागली पण कितीही झालं तरी तिथून पाय काही हलेना. सहयाद्रीचे वेड आम्हाला का लागते ते अश्या अनगड, अनवट जागी जाऊन ते कधीतरी अनुभवा तुम्हांलाही नक्कीच लागेल. आता उतराई करायची असल्याने सचिन भाऊ जोमात होते पटापट खेतोबाची घळ पार करून साहेब एक दगडावर मस्त झोपले होते तेच आम्ही दोघे त्याच्याजवळ जाणार तर मागे सुरुंग लावल्यागत भयानक आवाज आला पाहतोतर १० ते १५ फुटाचा कडा तुटून दरड कोसळली होती. सचिन दादा तर झोपायचं सोडून टूणकण उडून धावतच वाजंत्री घाटाच्या फाट्यावर आले राकेश पुन्हा एकदा पोटधरून हसू लागला.  
खेतोबा घाट उतरताना
वाजंत्री घाटाकडे जाणारा उजवीकडील फाटा या फलकाजवळून जातो 
फलक लावलेल्या झाडापासून पुढे वाट या दोघांना काही मिळेना मग मीच थोडे पुढे जाऊन वाट पाहून आलो तेच एका झाडाला भगवे रिबीन सापडले तसे या दोघाना बोलवून पुढील वाटेला लागलो. वाजंत्री घाटाची पुढील वाट रुळलेली असल्याने आरामात फोटोग्राफी करत चाललो होतो. भीमाशंकरच्या सर्व घाटवाटांची चाल दोन टप्यात असतात हे दोन्ही टप्पे साधारण एकाच ५०० ते ६०० मीटर उंचीचे आहेत. 
 वाजंत्री घाटाकडे जाणारी मळलेली पायवाट 
वाट रुळलेली असल्याने कुठेही चुकण्याचा संभव येत नाही आता वाट झाडाझुडपातून मोकळया वाटेवर आलो तेच समोर धबधब्यांची जत्राच होती जणू डावीकडे पाहिलं तर रणतोंडीचा धबधबा फेसाळत वाहत होता. चोहीकडे रौद्रप्रतापी धबधबेचं धबधबे आणि त्यांचा जोरदार आवाज कदाचित याचंमुळे या घाटवाटेला वाजंत्री घाट म्हणत असतील. 
रणतोंडीचा धबधबा  

ते सह्याद्रीचं रांगडं रूप डोळ्यात साठवत पुढे निघालो वाजंत्री घाटाची वाट आता सौम्य झाली होती रणतोंडीच्या धबधब्याला असंख्य धबधबे येऊन मिळतात आणि त्याच ओढ्याच्या उजवीकडून हि वाजंत्री घाटाची वाट खाली कामतपाडयात येते. 
वाजंत्री घाटात पडणारा जोरदार पाऊस
उजवीकडे दिसणारा जामरुंगचा डोंगर 
आम्ही आरामात उतरत दुपारचे ३ ला कामतपाडया गाडीजवळ आलो आणि गाडी चालू करणार तेच आतून ताईने हाक दिली "चहा ठेवली आहे पोरांनो ती तेवढी घेऊन मग पुढे जा" किती ते आदरतिर्थ मन भरून आल. 


 कामतपाड्याकडे जाणारी वाट 
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना पुढील ५मिनिटात गरमागरम चहा समोर आला. ताईचे मनोमन आभार मानत तेथून निघालो वाटेत परत एकदा पिकनिक छाप मंडळी हुल्लड बाजी करताना दिसली आंबिवली मध्ये आलो. तेच पेठच्या किल्ल्यावरून येणारा १५० ते १६० माणसाचा गलका दिसला त्यातील बहुतेकाची चाल बदकावाणी झाली होती. सचिन दादाना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी त्याला कर्जत स्टेशनला मला आणि राकेशला ड्रॉप करण्यासाठी सांगितलं मग पुढील प्रवास ट्रेन करणार होतो. ट्रेन तशी भरलेली होती पण कसेतरी आम्हां दोघांना बसायला जागा भेटली पुढे डिकसळ आणि नेरळला तर पिकनिक छाप माणसाची गर्दी ने तर जीव गुदमरायला आल्यासारखा वाटू लागला होता कसेतरी कढ काढत घाटकोपर स्टेशन वर उतरलो तेव्हा कुठे या पुर्थ्वी तलावावर आपण जिवंत आहोत याची जाणीव झाली. 

------------तूर्तास रजा घेतो भेटू पुन्हा एकदा सह्याद्रीतील अनगड आणि अनवट वाटेवर-------      

फोटो साभार:- राकेश पवार, सचिन कदम












No comments:

Post a Comment